Spread the love

“कोरोना’ला घाबरू नका, धीराने समोर या…!

जळगावात “सुपर स्पेशालिटी’ सुविधा देणारे “कोविड-19 रुग्णालय’- अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे

जळगाव,(जिमाका वृत्तसेवा) ता. 11 – देशभरात “कोरोना’ संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा तातडीने पाऊल उचलत असून, सर्वच पातळ्यांवर दक्षता घेतली जात आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अर्थात “कोविड 19′ रुग्णालयात “कोरोना’सह “क्वारंटाइन’ रुग्णांसाठी “सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’पेक्षाही अधिक चांगल्या दर्जाची सेवा दिली जात आहे. “कोरोना’ रुग्णांना “सुपर स्पेशालिटी’ दर्जाची सेवा देणारे महाराष्ट्रातील हे पहिले रुग्णालय असेल. असा विश्वास जळगाव येथील शासकीय वैदयकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सुचनेनुसार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अर्थात “कोविड 19′ रुग्णालयात रुग्णांना चांगले उपाचार मिळावे. याकरीता जिल्हा नियोजन समितीमार्फत 2.5 कोटी रुपयांचा निधी उपलबध करुन देण्यात आला असून या निधीतून याठिकाणी सुपर स्पेशालिटी दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. या सुविधांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. खैरे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ किरण पाटील व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
“कोरोना’ संसर्ग होण्याची भीती जगभरातील सर्वांना आहे. घरातील व्यक्तीला सर्दी, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होत असला, तरी ती व्यक्ती डॉक्‍टरांकडे जात नाही. जर आपण डॉक्‍टरांकडे गेलो आणि मला “कोरोना’ची लक्षणे आढळली तर मला “क्वारंटाइन’ करून घेतील. माझ्या कुटुंबाची बदनामी होईल, समाजात वेगळ्या नजरेने मला पाहिले जाईल. माझ्या मुलाबाळांचे पुढे कसे होईल, जिल्हा “कोविड- 19′ रुग्णालयात दाखल केले, तर मी घरी जिवंत येईल किंवा नाही, अशा एक ना अनेक शंका नागरीकांच्या मनात आहेत. यामुळे अनेकांना लक्षणे जाणवत असूनही ते डॉक्‍टरांकडे जात नाहीत. इतरांना त्याबाबतची माहिती देत नाहीत.
नागरीकांच्या मनातील भिती दूर करणे, त्यांनी तपासणी व उपचारासाठी पुढे आले पाहिजे. असेही डॉ खैरे म्हणाले.
“कोरोना’ संसर्ग बरा होणारा आजार
खरे म्हणजे “कोरोना’ संसर्गाची लागण झालेला रुग्ण योग्य उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होऊन घरी गेल्याची अनेक ठिकाणी उदाहरणे आहेत. यासाठी “कोरोना’ संसर्ग बरा होणारा आजार आहे. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. “कोरोनाला घाबरू नका, धीराने समोर या…’ जळगाव जिल्हा कोविड-19 रुग्णालयात “कोरोना’ रुग्णांसाठी अत्याधुनिक प्रकारची उपचारप्रणाली उपलब्ध आहे. यामुळेच शहरातील “पॉझिटिव्ह’ आलेला रुग्ण आता बरा होण्याच्या मार्गावर आहे.

दोनशे खाटा सुसज्ज

“कोरोना’ संशयित रुग्णांसाठी जळगाव जिल्हा “कोविड-19′ रुग्णालयात 200 खाटा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आयसोलेशन वॉर्ड, क्वारंटाइन वॉर्डाचीही येथे निर्मिती करण्यात आली. नवीन कॉट, नवीन गादी, नवीन बेडशीट आहे. “कोरोना’ रुग्णाचे तीन प्रकार आहेत. “माइल्ड’ (साधा), “मॉडरेट’ (सौम्य लक्षणे असलेला), “क्रिटिकल’ (पॉझिटिव्ह). साध्या रुग्णाला ताप, थंडी अशी लक्षणे असतात. त्याची तपासणी करून घरी पाठवितात. ज्यात काहीअंशी लक्षणे दिसतात त्याला “क्वारंटाइन’ कक्षात 14 दिवसांसाठी ठेवले जाते. ज्याला श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, खोकला वाढला असेल त्याला संशयित रुग्ण म्हणून त्याचे “स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात येतात. नमुना “पॉझिटिव्ह’ आला तर त्याला “आयसीसीयू’ कक्षात ठेवले जाते.
रुग्णांची तीन वेळा तपासणी
जो “पॉझिटिव्ह’ रुग्ण आहे, तो “आयसीसीयू’त ठेवला जातो. तेथे केवळ डॉक्‍टर, परिचारिकांनाच प्रवेश आहे, तेही पीपीटी किट घालूनच. उपचार करणारे डॉक्‍टर, परिचारिकांना घरी वेगळ्या रूममध्ये “क्वारंटाइन’ राहण्यास सांगितले जाते.
अशा आहेत सोयी-सुविधा
* सर्वच रुग्णांसाठी सॅनिटायझेशन चेंबर
* दिवसातून चार वेळा आयसीसीयू कक्ष, क्वारंटइन कक्ष सॅनिटराइज होतो
* रुग्णांसाठी 16 व्हेंटिलेटर सज्ज
* 100 डॉक्‍टर तैनात
* 135 नर्सिंग स्टाफ
* 120 कर्मचारी
* सर्वांची ड्यूटी 8-8 तास
* कोरोना आयसीसीयू कक्ष, क्वारंटाइन कक्षाची तीन वेळा स्वच्छता
अशी असते रुग्णांची दिनचर्या
* “पॉझिटिव्ह’ रुग्णाची दर दोन तासांनी तपासणी
* त्याला शक्‍यतोवर सलाइनवरच ठेवले जाते
* सलाइनमधूनच सर्वप्रकारच्या औषधी दिल्या जातात
* गरज पडल्यास रुग्णाला व्हेंटिलेटर ठेवले जाते
लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी…
जे संशयित रुग्ण आहेत, अशांसाठी क्वारंटाइन वॉर्ड आहे. यात दिवसभरात दोन वेळा तपासणी केली जाते. त्यांना सकाळी चहा, नाश्‍ता, दुपारी जेवण, रात्री जेवण दिले जाते. लक्षणांनुसार ठरवून औषधी दिल्या जातात. 14 दिवस अशा रुग्णाला देखरेखीखाली ठेवून पुन्हा “स्वॅब’ घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. अहवाल “निगेटिव्ह’ आला तर घरी सोडले जाते. “पॉझिटिव्ह’ आला, तर पुढील उपचारासाठी “आयसीसीयू’ कक्षात दाखल करून उपचार केले जातात.
“कोरोना’ची भीती बाळगू नका
“कोरोना’ग्रस्त रुग्णांचे 24 तास निरीक्षण केले जाते. 200 खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णांची घरी किंवा खासगी रुग्णालयात जेवढी काळजी घेतली जात नाही, त्यापेक्षा अधिक काळजी घेतली जाते. जळगावात दाखल “पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. नागरिकांनी “कोरोना’ची भीती बाळगू नये. सर्दी, ताप, श्‍वास घेण्यास त्रास, खोकला अशी लक्षणे दिसताच रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. त्रास लपवू नये. येथे असलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे आलेला प्रत्येक रुग्ण बरा होईल, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

जिल्ह्यात लॉकडाउन असताना नागरिकांना अत्यावश्‍यक कामांसाठीच बाहेर पडावे. “सोशल डिस्टन्सिंग’ पाळावे, गर्दी करू नये. सर्दी, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणी करावी. तेथे अत्याधुनिक उपचाराची सुविधा “कोरोना’ रुग्णांसाठी आहे असे डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव यांनी सांगितले.

“कोरोना’ग्रस्त संशयितांवर उपचारासाठी सर्व मोफत सुविधा जिल्हा रुग्णालयात आहेत. ज्या व्यक्तींना लक्षणे जाणवू लागल्यास त्यांनी लगेच रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. “कोरोना’च्या रुग्णांसाठी अत्याधुनिक प्रकारची उपचारप्रणाली आम्ही सुरू केली आहे. असे डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव म्हणाले.

रुग्णांबरोबरच स्वतःची दक्षता
डॉ. चिन्मय कोल्हे

– येथे आलेल्या रुग्णास अगोदर सॅनिटायझेशन करतो. त्यात आढळणाऱ्या लक्षणांवरून त्यावर उपचाराची दिशा ठरविली जाते. अधिक लक्षणे असतील तर “स्वॅब’ करून त्याचा अहवाल पाठविला जातो. आलेल्या रुग्णांना क्वारंटाइन करतो. सर्व तपासणी पीपीटी किट घालून, मास्क लावून करतो. घरी गेल्यानंतरही अगोदर आंघोळ करून नंतर कुटुंबीयांशी अंतर ठेवूनच बोलतो.
रुग्णांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व सांगते
माया वानखेडे (परिचारिका) : येथे आलेल्या रुग्णांना एका रांगेत लांबच लांब अंतरावर बसवून “सोशल डिस्टन्सिंग’चे महत्त्व सांगितले जातात. खोकताना, शिंकताना तोंडाला रुमाल लावण्यास सांगितले जाते. रुग्णांची माहिती घेऊन तो कोठे-कोठे कोणाच्या संपर्कात आला, याची माहिती घेते. जर लक्षणे तीव्र असतील, तर त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यास संबंधितांना सांगितले जाते.